मराठी साहित्याची प्रतिभा उंचावण्यात शिक्षकांचा मोठा वाटा – वि. दा. पिंगळे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दोन हजार वर्षाहून अधिक काळाचा वारसा असलेल्या मराठी भाषेला व साहित्याला समृद्ध करण्यामध्ये व त्याची प्रतिभा उंचावण्यामध्ये शिक्षकांची मोठी भूमिका असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहकार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी आज येथे व्यक्त केले.
मराठी अध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरामध्ये ‘शिक्षकांचे लेखकपण’ या सत्रामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील अनिल पंजाबी होते. यावेळी व्यासपीठावर अध्यापक संघटनेचे विश्वस्त हनुमंत कुबडे, यशवंत बेंद्रे, नाना शिवले, पांडुरंग पवार उपस्थित होते. वंदना कोकाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पिंगळे म्हणाले की, मराठी भाषेला आकार देण्याचे काम लेखक व कवींनी मागील काही शतकात भारतात केले. तर जगातील काही राष्ट्रात वैचारिक अंधकार जेव्हा पसरला होता तेव्हा त्यास नाहिसे करण्याचे काम तेथील विचारवंतानी व शिक्षकांनी केले. मराठीतील ऐंशी टक्के लेखक व कवी हे शिक्षक होते, हा इतिहास आहे. सावित्रीबाई फुले, साने गुरूजी विंदा करंदीकर ते अलिकडील पु. ल. देशपांडे ही त्यामधील काही उदाहरणे आहेत. शिक्षक हा उत्तम लेखक होऊ शकतो त्यासाठी विदयार्थी हा पुस्तक समजून त्याकडे पहा. करपलेल्या अनेक चेहऱ्यांमध्ये शिक्षकाला सौंदर्य शोधता येऊ शकते व शिक्षक हा भाषेचा वारकरी होऊ शकतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल पंजाबी यांनी भाषेच्या विकासाची माध्यमे शिक्षकच विकसित करू शकतात. लोकशिक्षण आणि समाजशिक्षणातून मराठी भाषा समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.
आरती वळवी यांनी प्रास्ताविक केले. वसंत घनवट यांनी सूत्रसंचालन केले. तर, जयश्री दहिफळे यांनी आभार मानले. तर, अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे, संतोष काळे, विष्णु मुंजाळे, सोमनाथ भंडारे, नवनाथ तोत्रे, कॅलास घणंद, सुरेश लोखंडे, भास्कर पानसरे, स्मिता ओव्हाळ, दीपाली नागवडे, रूपाली ढमढेरे, सोनाली कातोरे, हेमा नवले, संजय गवांदे यांनी नियोजन केले.