काश्मीरमधील दल सरोवर गोठले
काश्मीर म्हणजे भारताचे नंदनवन. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणी आता थंडीमुळे तापमानाचा पारा उतरला आहे. थंडीच्या दिवसात याठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फही पडतो. आता येथील तापमान घटले असल्याने श्रीनगर येथील जगप्रसिद्ध असणारे दल सरोवरही गोठले आहे. आता येथील निचांकी तापमानाची नोंद ६ अंश सेल्सियस इतकी झाली असून दल सरोवराचा बराचसा भाग गोठला आहे. येत्या काळात हे तापमान आणखी घटले तर संपूर्ण सरोवरच गोठण्याची भिती व्यक्त होत आहे.
काश्मिरच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असलेले हे सरोवर पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येतात. येथील वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या शिकारा या बोटींमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे या सरोवराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे सरोवरातील पाणी गोठल्याने येथील स्थानिकांचे दैनंदिन जगणे काहीसे अवघड झाल्याचे चित्र आहे. तर पाण्यातून बोटी बाहेर काढताना येथील नावाड्यांची कसरत होत आहे. मागील ११ वर्षातील डिसेंबरमधील हे सर्वात निचांकी तापमान असल्याचे समजते. याआधी २००७ मध्ये ३१ डिसेंबरला सर्वात कमी म्हणजे ७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. श्रीनगरबरोबरच पेहेलगाम, कारगिल, कुपवाडा याठिकाणीही अतिशय कमी तापमानाची नोंद झाली आहे.