कामातून नाव कमवा, मग निवडणूक लढवा
आदित्य ठाकरे यांचा तरुणाईशी संवाद
तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखरी आनंदाची बाब आहे. परंतु, राजकारण म्हणजे केवळ निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आवडीच्या क्षेत्रात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करायला हवे. सुज्ञ मतदार आपल्या पाठीशी असलेल्या नावापेक्षा कामाला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे आपल्या कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा, असा सल्ला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तरुणाईला दिला.
‘आंत्रप्रिनीयर्स ऑर्गनायझेशन’च्या ‘ईओ पुणे’ शाखेतर्फे आदित्य ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ठाकरे बोलत होते. पुणे शाखेचे सदस्य अक्षय आढळराव पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वारशाच्या भरवशावर फार काळ टिकू शकत नाहीत. तुमचे कामच ग्राह्य़ धरले जाते. काम नसेल तर लोक लगेच नाकारतात. स्वसंरक्षण, पर्यावरण सुरक्षा, २४ तास चालणारे रेस्टॉरंट्स असे पक्षाने हाती घेतलेले नवे मुद्दे हे एक आव्हान आहे. वरकरणी हे मुद्दे फक्त शहरी दिसत असले तरी यासोबत अनेक गरीब, ग्रामीण कुटुंबांशी जोडले गेलेले आहेत. शहराला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर आपल्या विचारांच्या आणि नियम-कायद्यांच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे.