कांदा लिलाव बंद पाडत सरकारचा निषेध
नाशिक | कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची घोषणा होऊनही प्रत्यक्षात अधिसूचना न निघाल्याने कोसळणाऱ्या दरामुळे हवालदिल झालेल्या संतप्त उत्पादकांनी लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, येवला, सटाणा आदी बाजार समित्यांचे लिलाव बंद पाडले. दोन-तीन दिवसांत कांदा दरात ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन केले. शासकीय धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी त्यात भर पडून ११०० ते १२०० रुपये रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवसागणिक आवक वाढत असल्याने आठवडाभरात हे दर हजारच्या आत येतील आणि त्यामुळे तोटा सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाने निर्यात खुली केल्यास दर टिकून राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
चार दिवसांपूर्वी वाणिज्यमंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यात खुली करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात आदेश न निघाल्याने निर्यात सुरू होऊ शकली नाही. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा दरात घसरण होत असल्याचा आक्षेप असताना सोमवारी लिलावातील घसरण बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला.
संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे, लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, सटाणा असे बहुतांश बाजार बंद पाडले. उमराणे येथे उत्पादकांनी महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मुंगसे येथेही शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मालेगावच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.