काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का?, आशिष शेलारांचा घणाघात
मुंबई – काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा सणसणीत टोला भाजपनेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वाचा :-नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज; संजय राऊतांचा दुजोरा
शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला. तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला.”
“वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर ‘ट्रॅक्टर’ फिरवणार का? असे अनेक प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेला विचारले.