काँग्रेसमध्ये एक ना धड भाराभर चिंध्या, नारायण राणेंची टीका
मुंबई – काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावरून सध्या पक्षात बराच गोंधळ सुरू आहे. या गोंधळावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. हवं तसं नेतृत्त्व आज काँग्रेसकडे नाही. काँग्रेसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, अशी टीका करतानाच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली.
काँग्रेसच्या कार्यपद्धतीला नेते कंटाळले आहेत. त्यामुळेच पत्रं पाठवून नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक सुरू आहे. पण अद्यापही कुणाच्याच नावावर एकमत होताना दिसत नाही. राहुल गांधीही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार नाहीत आणि दुसऱ्या नावाची कोणी शिफारस करतानाही दिसत नाही, असं सांगतानाच आज देशात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत कठिण आहे. आज हवं तसं नेतृत्व काँग्रेसकडे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असं नारायण राणे म्हणाले.
काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षपदावर जेवढे वाद होतील. तेवढं काँग्रेसचं खच्चीकरण होईल. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळेल, असं सांगतानाच काँग्रेसची अवस्था सध्या एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, असं ते म्हणाले. काँग्रेसमध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे. पण काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळण्याची क्षमता कुणामध्येही नाही. जर क्षमता असेल तर काँग्रेस नेत्यांनी पुढे यावं आणि सांगावं आम्ही अध्यक्षपद सांभाळतो. पण एकाही तरुणाकडे तेवढी क्षमता आहे, असं सध्या तरी दिसत नाही, असंही ते म्हणाले.