काँग्रेसने ईडीचा सर्वाधिक गैरवापर केला, विरोधी पक्षनेत्यांची टीका
काँग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा सर्वाधिक गैरवापर झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्यानंतर भाजप ईडीचा वापर करून दबाव निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते. तुम्ही काही केले नाही तर घाबरता कशाला ? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. फडणवीस म्हणाले की, तुम्ही काहीही केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळातच ईडीचा सर्वाधिक गैरवापर झाल्याची टीका त्यांनी केली.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्य सरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली आघाडी सरकार मूठभर लोकांना लाभ पोहोचवण्याचे काम करीत असून यामुळे राज्याचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार असून हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.