काँग्रेसचा सुपडा साफ, दिग्विजय सिंह यांनी आळवला EVMचा मुद्दा
नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सत्ताधारी ‘आप’ ५४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने १५ जागेपर्यंत मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यातच जमा आहे.
याचदरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मतमोजणी दरम्यान ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, ईव्हीएम टेंपर प्रूफ नाही. कोणताही विकसित देश याचा उपयोग करत नाहीत. त्यांनी याबाबत टि्वट केले आहे. ते म्हणाले, चिपवाली कोणतीही मशीन टेंपर प्रूफ नाही. कृपया, एक मिनिटासाठी विचार करा की विकसित देश ईव्हीएमचा उपयोग का करत नाहीत?
त्यांनी सर्वोच्च न्यायालय तथा निवडणूक आयोगाला ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्याचा आग्रह केला आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोग आणि माननीय सर्वोच्च न्यायालय भारतात ईव्हीएमवर मतदानाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा विचार करतील का? आपली लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे, आणि आम्ही काही धोकेबाज लोकांना निवडणुकीचे निकाल हॅक करण्यापासून आणि १.३ अब्ज लोकांचा जनादेश चोरण्याची परवानगी देऊ शकत नाही.