नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर माझी बदली करा – तुकाराम मुंढे
नाशिक – अविश्वास ठरावावर निर्णय शासनाचा असतो, पण माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. माझी बदली करुन जर नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर माझी बदली करा. शिवाय वारंवार बदली केली जाते याचे नक्कीच वाईट वाटते. पण निर्णय शासनाचा असतो, असा खुलासा नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला.
कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणत आहे. मात्र या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंढेंनी पाठिंब्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत.
तुकाराम मुंढे म्हणाले, अविश्वास ठरावावर निर्णय शासनाचा असतो, पण माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. करवाढीबाबत चुकीचा संभ्रम तयार केला जात आहे. 40 पैसे जी करवाढ मी केली होती ती पाच पैशांवर आणली आहे. करवाढीचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
माझे काम नाशिकच्या विकासासाठी चालले आहे. त्यासाठी मला योग्य वेळ आणि निधी अपेक्षित आहे. करवाढीतून निधी जमवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेळ ही बदलीवर अवलंबून आहे, पण माझी बदली करुन प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करा, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.