कसला ‘सर्जिकल स्ट्राईक’ ? हे तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे थोतांड!
एका रात्रीत रस्ता होतोच कसा? : विरोधी पक्षनेता दत्ता साने यांचा घणाघात
पिंपरी। महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।
भोसरी-दिघीला जोडणारा सावंतवाडी येथील रस्ता गेली पंचवीस वर्षे रखडलेला आहे. आता एका रात्रीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. हे कसे शक्य आहे. त्यावर भोसरीचे आमदारांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा कांगावा सुरू केला आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ करायला भोसरी-दिघी हा काय पाकिस्तानमधील प्रांत आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे. तसेच, विकासकांचा कांगावा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले थोतांड आहे, अशी जहरी टीकाही साने यांनी केली आहे.
***
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी ते दिघी जोडणारा सावंतवाडी रस्ता गावांचा महापालिकेत समावेष झाल्यापासून प्रलंबित आहे. स्थानिक जागामालक काटे आणि गवळी यांच्यातील मतभेद होते. भूसंपादन आणि त्याद्वारे मिळणा-या मोबदल्यावरुन काही जागामालकांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. परिणामी, दिघीतील सुमारे ८० ते ९० हजार लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांना भोसरीकडे ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत होती.
दरम्यान, भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. काटे आणि गवळी यांच्यात समेट घडवून आणला. स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने एका रात्रीत रस्त्याचे काम मार्गी लावले. एकप्रकारे आमदार लांडगे यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध होवू लागल्या आहेत. आमदार लांडगे समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या स्टाईलने ‘राडा’ सुरू केला आहे. या सर्व प्रकाराचा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खरपूस समाचार घेतला आहे. रस्त्याचे काम करून भोसरीत ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाल्याचा कांगावा करण्यात येत आहे. एका रात्रीत हा रस्ता होतोच कसा?, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी रात्री कोणाच्या आदेशावर काम करतात, असे प्रश्न साने यांनी उपस्थित केले आहेत.
***
सागर गवळी रात्री कसे राजी झाले? : योगेश गवळी
भोसरी-दिघी रस्त्यात बाधित नागरिकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे एवढी वर्षे हा रस्ता रखडला होता. तरी, भोसरी-दिघीतील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता होणे गरजेचे होते. त्यासाठी मी स्वतः महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता. स्वःखर्चातून रस्ता करून देण्याची तयारी ठेवली होती. ३० लाख रुपये डांबरीकरणाला खर्च येणार होता. त्यावेळी विद्यमान नगरसेवक सागर गवळी यांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला. हा रस्ता कदापि होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच रस्ता आजपर्यंत रखडला गेला. रात्रीतून हा रस्ता कसा काय मार्गी लागू शकतो?. एका रात्रीत सागर गवळी राजी कसे झाले? नागरिकांची सोय झाली याबद्दल आपले दुमत नाही. परंतु, जो बाधित जागा मालक आहे. त्याच्या मोबदल्याचे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर गवळी यांनी उपस्थित केला आहे.
***
राजकीय श्रेय लाटणे शोभत नाही!
भोसरी-दिघी जोडणारा सावंतवाडी येथील रस्ता करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ८४ लाख रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली. हे पैसे लोकांच्या करातून जमा झालेले पैसे आहेत. त्यामुळे ९ मीटर रुंदीचा रस्ता झालेला असला तरी त्याचे श्रेय लाटणे हे राजकीय नेते अथवा नगरसेवक, पदाधिका-यांना शोभत नाही. कारण, याच राजकीय पुढा-यांमुळे भोसरी-दिघी या रस्त्याने वहिवाट करणा-या रहिवाशांना गेली कित्येक वर्षे यातना भोगाव्या लागल्या आहेत. त्यामुळे रस्ता जरी केला असला तरी त्याचे श्रेय लाटणे अयोग्य आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.