औरंगाबादेत भाजप प्रदेश उपाध्यक्षाच्या घरावर ‘दगडफेक’
औरंगाबाद | महाईन्यूज
औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी (दि. 21) हल्ला झाला. त्यांच्या घरासमोरील दोन गाड्या हल्लेखोरांनी फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप -शिवसेना वाद विकोपाला
औरंगाबाद महापालिका निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यातच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षातील वाद टोकाला पोहोचला आहे. त्याचे पडसाद शहरात उमटू लागले आहेत. त्यातूनच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात भागवत कराड यांच्या घरासमोरील दोन गाड्या फोडण्याल्या आहेत. शिवाय, त्यांच्या घरावर हल्लेखोरांनी दगडफेकही केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
शिवसैनिकांनीच केला हल्ला ?
भाजपतून शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेेले किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या गोटातून होत आहे. तनवाणी यांच्यावर टीका करताना कराड यांनी म्हटले आहे की, ‘तनवाणी हा सत्तेला चिकटलेला मुंगळा आहे’. त्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांनी दोघांनाही केली अटक
हल्ला झाल्यानंतर तातडीने भाजप कार्यकर्ते क्रांती चौक पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलिसांनी दोघांना अटक केली. एकाला ताब्यात घेतले आहे. संतोष सुरे, रंगनाथ राठोड यांना अटक केली आहे. तर, सचिन जव्हेरीला ताब्यात घेतले आहे. घडलेल्या प्रकारामुळे औरंगाबाद शहरात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील राजकीय वाद विकोपाला गेल्याचे चित्र दिसत आहे.