‘उपहासात्मक’ ट्विटच्या प्रत्येक शब्दावर ठाम : निधी चौधरी
महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या उपहासात्मक ट्विटनंतर मुंबई महानगरपालिकेच्या माजी उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर टीकेची झोत उठली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली. तसेच त्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही त्यांना देण्यात आली होती. परंतु आपली करण्यात आली बदली ही शिक्षा नसल्याचे मत निधी चौधरी यांनी व्यक्त केले. ट्विटमधील माझ्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे. सोशल मीडियावर महात्मा गांधींवर जी टीका सुरू होती त्या पाहून मला वेदना झाल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
माझा आपल्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. प्रशासकीय कारणांसाठी कोणाचीही बदली करण्याचे अधिकार सरकारला आहेत आणि सरकारने दिलेल्या आदेशाचे मी पालन करेन, असे निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. 17 मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचे छायाचित्र त्यासोबत शेअर केले होते. त्यानंतर त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचे पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली होती.
दरम्यान, चौधरी यांनी त्यानंतर स्पष्टीकरण देत ते एक व्यंगात्मक ट्विट होते आणि त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले होते. त्या ट्विटमध्ये कोणते चुकीचे शब्द वापरल्यामुळे ते ट्विट डिलिट केले नसून अन्य कोणी त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, यासाठी ते डिलिट केल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया हे आपले मत व्यक्त करण्याचे एक उत्तम साधन आहे. जेवढे आपले मत व्यक्त करण्याचे अधिकार सामान्यांना आहेत, तेवढेच अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आहेत. केवळ सरकारी धोरणांवर टीका न करण्याचे बंधन आहे. मी सरकारच्या कोणत्याही धोरणावर टीका केली नाही. त्यामुळे मी केलेले ट्विट हे नियमांच्याच चौकटीत बसून केलेले ट्विट असल्याचेही त्या म्हणाल्या.