उत्तर प्रदेशात 56 जगांवर भाजपची आघाडी
दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाप्रणित रालोआ २९८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसप्रणित संपुआ – १०६, अन्य पक्ष – ११७ जागांवर आघाडीवर आहेत.
१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या सर्वांचे भवितव्य गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत निश्चित होईल. लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच मतपावती जोडलेल्या मतदान यंत्रांचा (व्हीव्हीपॅट) वापर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रे आणि मतपावत्या याआधारे मतपडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतपावती जोडलेल्या ३० मतदान यंत्रांची पडताळणी झाल्यानंतरच निवडणूक अधिकारी अधिकृत निकाल जाहीर करतील.