उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळलं
महाईन्यूज | उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. पीडित महिला ८० टक्के भाजली असून उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली ते पाहून मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.