भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन
नवी दिल्ली – राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मिल्खा सिंग यांचं आज निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते.मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता.
मिल्खा सिंग यांनी त्या काळी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आतापर्यंत बरीच सुवर्णपदके त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती आणि क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते. १९५८ साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर १९६० साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे.”