कोल्हापूरात कामगारांचा विराट मोर्चा ; ‘भाजप हटाव’, ‘देश बचाव’चा नारा
कोल्हापूर – शालेय पोषण आहाराच्यामाध्यमातून लहान-लहान मुलांना घास भरवणाऱ्या कामगारांना स्वताला वेळेत घास मिळत नाही. शासन त्यांना महिन्याला केवळ एक हजार रुपये मानधन देते, या मानधनाऐवजी वेतन सुरू करावे. आशा कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करा, या मागणी साठी सर्वच क्षेत्रातील कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात घोषणा आणि भाजप हटावचा नारा देत सामुदायिकरित्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.
आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच इतर कर्मचारी शहरात जमले होते. त्यानंतर सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. दरम्यान, मोर्चात सहभागी महिला व इतर कर्मचाऱ्यांमुळे वाहतूकीची कोंडी झाली.
शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्या
- केंद्रीय किचन पध्दत कायमची हद्दपार करावी.
- वर्षाला 10 महिन्याऐवजी 12 महिन्यांचे मानधन मिळाले.
- 45 व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीप्रमाणे 18 हजार रुपये पगार मिळाला पाहिजे.
- किमान वेतनाची जोपर्यंत अमलबजावणी होत नाही तोपर्यंत 10 हजार पगार मिळाला पाहिजे.
- कामगारांना नियुक्त पत्र देऊन कायम सेवेत सामाऊन घेतले पाहिजे.
- व्यवस्थापन कमिटीचा मनमानी कारभार थांबला पाहिजे.
- विनाचौकशी व विहित प्रक्रिया केल्याशिवाय कोणत्याही कामगाराला तत्काळ कामावरून कमी करू नये.
- इंधन, भाजीपाला बिले व मानधन महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजेत. यामध्ये खूप उशीर केला जातो.
- प्रत्येक शाळेत किचन शेड व भौतिक सुविधांची व्यवस्था केली पाहिजे.
- पेन्शनसह सामाजिक सुरक्षाचा लाभ दिला पाहिजे