आळंदीत संचार बंदी, पण कार्तिकी वारीत तब्बल २५ किलो गांजा जप्त
पिंपरी |महाईन्यूज|
कार्तिकी वारीमुळे आळंदीत संचारबंदी लागू आहे. एक महिला ऐन वारीत गांजा विक्री करत असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली. छाप्यामधे एक लाख बारा हजार रूपयांची रोकड, साडे पंचवीस किलो गांजा आणि तेरा हजार रुपयांची विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या काही वर्षांपासून खुलेआम गांजा विक्रीचा धंदा सुरू होता. याप्रकरणी अंबिका मारूती गरूड (वय-५५, रा.घुंडरे गल्ली) हिच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी शुक्रवारी (दि.११) सायंकाळी छापा मारला.
छाप्यामधे चार लाख तीन हजार रुपयांचा सुमारे साडे पंचवीस किलो गांजा सापडला. आणि एक लाख बारा हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. सोबत पावणे तेरा हजार रुपयांची विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्याही सापडल्या. या कारवाईबाबत फिर्याद पोलिस हवालदार संदीप सोमनाथ गवारी यांनी दिली. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.