आपल्या संस्कृतीतील गोष्टी आपणच सांगायला हव्यात
ज्येष्ठ दिग्दर्शक जानू बरुआ यांची भूमिका
‘चित्रपट केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर तो त्या प्रांताचा, संस्कृतीचा प्रतिनिधी असतो. मात्र, आपल्या चित्रपटांनी कायम पाश्चात्यांचेच अनुकरण केले. आपल्या संस्कृतीमध्ये सांगण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्या आपणच सांगायला हव्यात. आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या चित्रपटांचा सन्मान होण्याची गरज आहे,’ अशी भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक जानू बरुआ यांनी सोमवारी मांडली.
आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित नवव्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बरुआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. संग्रहालयाच्या सहायक संचालक कीर्ती तिवारी, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सल्लागार मिलिंद लेले या वेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर काझीम ओझ दिग्दर्शित ‘झेर’ हा तुर्की चित्रपट दाखवण्यात आला.
‘फ्रेंच, युरोपीयन, हॉलिवूडच्या चित्रपटांप्रमाणे भारतीय आणि आशियाई चित्रपट स्वतची ओळख निर्माण करण्यात अडखळले आहेत. आपल्याकडे गावोगावी न सांगितल्या गेलेल्या असंख्य गोष्टी आहेत आणि पाश्चात्यांकडे सांगायला गोष्टीच नाहीत. पण जग काय म्हणेल याचा विचार केल्याने किंवा आपलाच इतिहास नीटसा माहीत नसल्याने त्या गोष्टी कधी समोर येत नाहीत,’ असे बरुआ यांनी सांगितले.
आता खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू झाले..
गेल्या पंधरा वर्षांत ५० चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या गजेंद्र अहिरे यांचा बरुआ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गेल्या पंधरा वर्षांत मराठी चित्रपटाच्या आशय आणि तंत्रज्ञानात झालेल्या बदलाचा मी साक्षीदार आहे. चित्रपट करताना कधीच व्यावसायिकतेचे गणित मांडले नाही. काम करत राहिलो, चित्रपट होत गेले. या दरम्यान चित्रपट कसा करू नये हे शिकायला मिळाले. तंत्राबरोबरच चित्रपट हे माध्यम म्हणून उमगले. अलीकडेच डिअल मॉली हा आंतरराष्ट्रीय चित्रपट करण्याची संधी मिळाली. पन्नास चित्रपट ही संख्या चमकदार असली, तरी मला आकडय़ांत रस नाही. आता खऱ्या अर्थाने चित्रपट कसा करायचा याचे शिक्षण सुरू झाले आहे,’ अशी भावना अहिरे यांनी व्यक्त केली.