रश्मी शुक्ला यांनी आमदार राजेंद्र यड्रावकर यांनाही धमकावलं होतं, आव्हाडांचा आणखी एक आरोप
मुंबई – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी धमकावले होते, असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शिरोळेचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपसोबत जावे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता रश्मी शुक्ला आणि भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाचा :-कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद
Rajendra.Yedravkar independent MLA from Shirol {Kolhapur} was forced by #RashmiShukla to oppose MVA and be with BJP was it her job … under wat authority did she act
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2021
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
त्यावेळी रश्मी शुक्ला रडल्या होत्या: आव्हाड
रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.