आता विसर्जन अस्वच्छतेचे!
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता; १० दिवसांत ८४१ मेट्रिक टन निर्माल्य जमा
अनंत चतुर्दशीनंतर मुंबईकर समुद्रकिनारे, रस्ते आदी ठिकाणी झालेल्या अस्वच्छतेचे विसर्जन करण्याकरिता सरसावले असून सोमवारी अनेक स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्यांनी पुढाकार घेत जुहू, दादर, माहीम येथील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे अवशेष, निर्माल्य, सजावटीचे साहित्य गोळा करण्यात आले. तसेच, पालिकेने मुंबईत दहा दिवसांत तब्बल ८४१ मेट्रिक टन निर्माल्य जमा केले आहे.
गणेशोत्सव काळात विसर्जनानंतर समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणावर कचरा जमा होतो. सामाजिक भान जपत उत्सवामुळे अस्वच्छ झालेले किनारे स्वच्छ करण्यासाठी मुंबईकर स्वयंस्फूर्तीने पुढे येतात आणि स्वच्छता मोहिमेत भाग घेतात. सोमवारीदेखील मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि तलाव परिसरात हजारो मुंबईकर उतरले होते. यात पर्यावरणप्रेमी संघटना, विद्यार्थी, गृहिणी आणि एल.जी.बी.टी. समूह आदींचा समावेश होता. साधारण ५ हजार प्र्यावरणप्रेमी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा आणि तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम सुरू असताना अभिनेता शाहीद कपूर याने देखील तेथे हजेरी लावली. त्याने या मोहिमेचे आणि आलेल्या पर्यावरण प्रेमींचे कौतुक केले.
गिरगाव येथे स्वच्छता मोहीम राबवणारे मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक सुभजीत मुखर्जी म्हणाले की, आज स्वच्छता करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्ती जबाबदार नागरिक बनून आली होती. प्रत्येकाच्या योगदानाने ही मोहीम यशस्वी झाली. डॉमिनोज आणि डंकिन डोनट्स कं पनीच्या ७५० कर्मचाऱ्यांनी विसर्जनानंतरच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. हे कर्मचारी जुहू समुद्रकिनाऱ्यावर तीन तास स्वच्छता मोहीम राबवत होते. मनसे कार्यकर्तेदेखील या मोहिमेत सहभागी झाले होते.