‘आता तरी भाजपात या’, सुजय विखे पाटील यांची वडिलांना विनंती
अहमदनगर – काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे. सुजय विखे पाटील यांनी बंड पुकारल्याने निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. सुजय विखे पाटील यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. सुजय विखे यांनी आता तुम्हीदेखील भाजपात यावं, अशी विनंती वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना केली आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले की, आम्ही आमचं सगळं काही पणाला लावलं होतं. वडिलांना त्यांचं विरोधी पक्षनेतेपदही सोडावं लागलं होतं, असं सांगताना निकाल लागल्यानंतर वडील फार आनंदात होते, त्यांना अभिमान वाटत असावा. काँग्रेस पक्ष सोडण्यासंबंधी विचारलं असता नगरमध्ये आपला वारंवार आपमान झाला. अपमान सहन न झाल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाने आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. आम्ही पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसची काय परिस्थिती झाली आहे, ते दिसून येत आहे. काँग्रेस एनसीपीच्या दबावाखाली काम करत आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही. माझा निर्णय योग्य होता, असं वडील म्हणत आहेत. आता तुम्हीदेखील भाजपात यावं, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
कोणत्याही पक्षात असलो तरी शेतकरी आणि सर्वसामान्याचं काम झालं पाहिजे. आज खासदारा झालो असून लोकांसाठी या पदाचा वापर करेन असं सांगताना जर आपल्याकडून अपेक्षित काम झालं नाही तर राजकारणातून निवृत्त होईन असंही सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणूक 2004 पर्यंत पारनेर विधानसभा मतदार संघाचा समावेश कोपरगाव (नगर उत्तर ) लोकसभा मतदार संघात होता. तोपर्यंत डॉ. विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे लोकसभेमध्ये कोपरगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायचे.दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे तालुक्यावर वर्चस्व होते. त्यांनी त्यावेळी उभारलेली कार्यकर्त्यांची फळी, कार्यकर्त्यांंचा संच तब्बल १५ वर्षांनंतरही टिकून आहे. विखे हाच आपला पक्ष हे मानणारा मोठा वर्ग आजही तालुक्यात आहे, सुजय विखे यांच्या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.