उरमोडी योजनेचे पाणी राजेवाडी तलावात सोडा – खासदार संजयकाका पाटील
सांगोला – आटपाडी व सांगोला तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. राजेवाडी डाव्या कालव्यावर दोन्ही तालुक्यातील शेती अवलंबून आहे. यासाठी किमान एक पाळी शेतकऱ्यांना पुरेल एवढे पाणी मिळावे. तसेच उरमोडी सिंचन योजनेचे पाणी राजेवाडी तलावात किमान दोन महिने सोडा असा आदेश कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी उरमोडीच्या अधिकाऱ्यांना दिले.
उरमोडी सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रवाह राजेवाडी तलावाच्या दिशेने सुरु झाला असून ते पाणी म्हसवडपर्यंत येवुन पोहचले आहे. या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी म्हसवड येथील गेस्ट हाऊसवर आढावा बैठक जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख व अधीक्षक अभियंता हनमंत गुनाले, राजेवाडी तलाव पाणी संघर्ष समिती व शेतकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
खासदार पाटील म्हणाले गेल्या दोन महिन्यापूर्वी मी दिघंची येथील झालेल्या बैठकीत सांगोला व आटपाडी येथील शेतकऱ्यांना राजेवाडी तलावामध्ये कोणत्याची परिस्थितीत पाणी आणणार असा शब्द दिला होता व त्याची पूर्तता होत असुन सध्या म्हसवडपर्यत असणारे उरमोडीचे पाणी दहा दिवसात राजेवाडीत दाखल होणार आहे. यासाठी मी व जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला व त्यांनी आम्हाला मदत केली.
सिंचन योजनेच्या १९ /८१ पॅटर्नप्रमाणे चार लाखापैकी रोज एक लाख याप्रमाणे दोन महिण्याचे ६० लाख रुपये आटपाडी व सांगोला तालुक्यामधील शेतकरी भरतील पण आम्हाला पुर्णक्षतेने पाणी द्या.
– आमदार गणपतराव देशमुख.