आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; वीजबिलाबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार?
मुंबई – आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढीव वीज बिलाच्या समस्येवर तोडगा काढून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे मंगळवारी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली आहे. अशातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकांवर अन्याय झाला असेल तर चर्चा होणे आवश्यक आहे. ऊर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल’, असे म्हटले. त्यामुळे वीज बिल कमी होण्याच्या सर्वसामान्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिलाच्या समस्येवर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.