आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून २,०२० लोकल फेऱ्या सुरु होणार
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलसेवा देखील सुरळीत होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकत्रितरित्या एकूण २०२० लोकल फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनास्थिती हळूहळू नियंत्रणात येताना पाहायला मिळत असल्याने हळूहळू जनजीवन सुरळीत करण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या या एकूण २,०२० लोकल फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेवर १,०२० तर पश्चिम रेल्वेवर १००० लोकल फेऱ्या आजपासून सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान आतापर्यंत मध्य रेल्वेच्या ७०६ तर पश्चिम रेल्वेच्या ७०४ लोकल फेऱ्या सुरु होत्या.
राज्य सरकारकडून सद्यस्थितीत मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्वसामान्य महिलांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.