आचारसंहिता कालावधीत राज्यात ४७७ गुन्हे दाखल
- ४१ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणांत ४७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अमलात आली आहे. या दरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररीत्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरूपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरूपाच्या ७८ प्रकरणांत करण्यात आली आहे. स्फोटके कायद्यानुसार तीन प्रकरणांत, तर २३४ प्रकरणांत, मालमत्तेचे विद्रूपीकरण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली ६२६ शस्त्रे, ४६ जिलेटीन आदी स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून ३२ हजार ९३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. २४ प्रकरणांत परवाना असलेली शस्त्रे कायद्यचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत.
निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ४१ हजार ६३८ जणांवर कारवाई करण्यात आली असून १५ हजार ८३८ प्रकरणांत अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. २७ हजार ४५७ प्रकरणांत अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आली असून १५ हजार ७११ प्रकरणांत ही कार्यवाही सुरू असल्याची माहितीही शिंदे यांनी या वेळी दिली.