आघाडीसह सेना एकत्रित आल्यावर, कोण माय का लाल निवडून येत नाही – अजित पवार
मुंबई –
“भाजपच्या सत्तेसाठी लागेल ती मदत करणार. लवकरच 145 आमदारांची जुळवाजुळव करुन सत्तास्थापनेसाठी भाजपला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे”, असे वक्तव्य नारायण राणेंनी केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “चार पक्षापैकी तीन मोठे पक्ष एकत्र आल्यावर कोण ‘माय का लाल’ निवडून येत नाही.” यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी अजित पवार बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन-आस्मानचा फरक आहे, हे कोणी नाकारुच शकत नाही. सर्व आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. कोणी काही करणार नाही. आम्ही एक ठरवलेलं आहे. जर एखाद्या पक्षातील एखाद्या आमदाराने कुठल्या दबावाखाली वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर तिथे निवडणूक लागली. जर ए, बी, सी हे तीन पक्ष असतील. ‘ए’चा आमदार फुटला, तर ‘ए’ पक्ष जो उमेदवार देईल, त्याला ‘बी’ आणि ‘सी’ पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले, तर कोण माय का लाल निवडून येणार नाही.” असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.