आई-वडीलांची सेवा करणा-यांना मोक्ष प्राप्ती होते- प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज
पिंपरी – प्रत्येक बाळाच्या जन्माच्या वेळी त्याची आई, वडील बरोबर असतात. त्याचे पालन पोषण करीत सर्व सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी पार करीत त्याच्यावर योग्य संस्कार करुन त्याला सज्ञान नागरिक म्हणून घडविणे ही प्रत्येक आई, वडीलांची जबाबदारी आहे. तसेच, त्या आई-वडीलांचा वृद्धापकाळात सांभाळ करणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. देव दर्शनासाठी देवळात, धर्मयात्रेत जाण्याची गरज नाही. कार्यबाहुल्यातून वेळ काढून आई वडीलांनाच देव मानून त्यांची सेवा करणा-यांना निश्चितच मोक्ष प्राप्ती होते, असे मार्गदर्शन प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी निगडी येथे केले.
निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब आणि प. पू. प्रफुल्लाकंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, सुर्यकांत मुथियान सुनिल नहार, रमणलाल लुंकड, पारस मोदी, सुभाष ललवाणी, मनोज सोळंखी, बाळासाहेब धोका, मोहनलाल संचेती आदींसह बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.
प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले की, आई, वडील व संत गुरुंच्या मार्गदर्शनाने मानवाच्या जीवनाला दिशा मिळते. जीवनाचा अर्थ आई वडीलांकडून कळतो, तर अध्यात्माचे महत्व संतांकडून कळते. संतांच्या हृदयात स्थान मिळविण्यासाठी पात्रता प्राप्त करावी लागते. ही पात्रता साधना करुन मिळविता येते. म्हणूनच जैन धर्मात तपाला, साधनेला महत्व आहे. जीवनातील कठीणसमयी आपणाला आई, वडील व संत खरा मार्ग दाखवितात, असेही प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले.