अहमदनगरमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या तेवढीच दिलासादायक
इतर जिल्ह्यांप्रमाणे अहमदनगरमध्येही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.जवळ जवळ सहा हजारांच्या पुढे ही संख्या गेली आहे. मात्र,महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही तेवढीच दिलासादायक आहे. चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास ६४ टक्के आहे.
नगर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच करोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता दिलासादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यापासून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.
गेल्या चोवीस तासाची आकडेवारी विचारात घेतल्यास जिल्ह्यामध्ये याकाळात ४३५ करोना बाधित नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा ६ हजार ३४६ झाला आहे. मात्र, याकाळात २६३ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येने सुद्धा चार हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तब्बल ४ हजार २५ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येच्या ६४ टक्के आहे. तर, सध्याच्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या २ हजार २४३ आहे. हे रुग्णही उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे.
दरम्यान, करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये, संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, असे आवाहन जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.