अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची सरकारकडून पायमल्ली : सुप्रिया सुळे
आरे परिसरात जी वृक्षतोड करण्यात आली त्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केलं. त्यानंतर शांततेने आंदोलन करणाऱ्या 29 आंदोलकांना अटक करण्यात आली. या कारवाईचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. 29 आंदोलकांवर सरकारने अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत ही लोकशाहीतील सप्तस्वातंत्र्यापैकी एक असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही पायमल्ली आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली. ज्यानंतर आंदोलन सुरु झालं. झाडं वाचवण्यासाठी आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यापैकी 29 आंदोलकांना शनिवारी अटक करण्यात आली. या कारवाईचा सुप्रिया सुळे यांनी कडाडून निषेध नोंदवला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा आरे परिसरतील झाडं कापण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी कडाडून निषेध नोंदवला. आरे परिसरात मेट्रो चे कारशेड उभारले जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. हे सगळे प्रकरण कोर्टात होते. कोर्टाने कारशेडला आडकाठी करता येणार नाही असे सांगितल्यावर तो आदेश ज्या दिवशी आला त्यादिवशी रात्री या भागात वृक्षतोड करण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनेही निषेध नोंदवला.