देशात २४ तासांत तब्बल ९० हजार ६३३ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस प्रचंड चिंताजनक होत आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल ४१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ असून दिवसभरात ९० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळणे हे अतिशय चिंताजनक आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४१ लाख १३ हजार ८१२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ७० हजार ६२६ जणांनी आपला जीव गमावला असून ३१ लाख ८० हजार ८६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या ८ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात १ हजार ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ४ कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.