अभिनेत्री पायल घोष आणि आठवलेंनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई – अभिनेत्री पायल घोष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्याची मागणी राज्यपालांकडे केली. राज्यपाल, पायल आणि आठवले यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली.
या भेटीनंतर रामदास आठवले यांनी सांगितले की, ‘राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे.’
तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावर राज्यपालांनी आपण याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’, असे आश्वासनही राज्यपालांनी पायलला दिले.
दरम्यान, अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचाराचा आरोप केला होता. तिने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.