”मी प्रचंड दबावाखाली ” CCD च्या संचालकांना सिद्धार्थ यांनी लिहिलेलं पत्र समोर
CCD अर्थात कॅफे कॉफी डे या प्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक आणि मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचं झालं तरी काय? हा प्रश्न आहे. कारण सोमवारपासून ते बेपत्ता आहेत. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले आणि तेव्हापासूनच ते बेपत्ता आहेत. नेत्रावती नदीच्या पुलावर ते बेपत्ता झाले. त्यांचं नेमकं काय झालं ते समजू शकलेले नाही. त्यांचा शोध अद्याप सुरुच आहे. असे बेंगळुरुचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी एएनआयला सांगितलं आहे. नेत्रावती नदीत शोध मोहीम सुरु आहे.
दरम्यान सध्या त्यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना लिहिलेलं पत्रही समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी आपण सीसीडीच्या अपयशाला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अत्यंत नैराश्यातून हे पत्र लिहिण्यात आल्याचं स्पष्ट होतं आहे.
काय आहे पत्रात ?
संचालक मंडळ आणि कॅफे कॉफी डे फॅमिली,
३७ वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर आपण आपल्या कंपनीत ३० हजार रोजगारांची निर्मिती करु शकलो. एक चांगला ब्रांड तयार करु शकलो. मात्र यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मी अपयशी ठरलो आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र हा व्यवसाय तारु शकलो नाही नफ्याकडे नेऊ शकलो नाही. माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला जो तोटा होतो आहे, त्यातून मी कंपनीला सावरु शकत नाही, या गोष्टीचा मला प्रचंड दबाव आला आहे. सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतले. माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. मी खूप काळ या सगळ्याचा सामना केला. मात्र मला आता हा तणाव सहन होत नाही. इक्विटी पार्टनर्सचाही प्रचंड दबाव माझ्यावर आहे.
मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करतो आहे हा व्यवसाय आता नव्या संचालक मंडळाकडे देण्याची वेळ आली आहे. मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे. मला खात्री आहे तुम्ही मला याबाबत माफ कराल. तुम्ही मला समजून घ्याल अशी खात्री आहे. कृपा करुन मला माफ करा.
व्ही. जी. सिद्धार्थ
या आशयचं पत्रही समोर आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रावरुनच सिद्धार्थ यांना नैराश्याने ग्रासले होते आणि ते कर्जबाजारी झाले होते ही बाब समोर येते आहे. त्यांचं नेमकं काय झालं? हे समजू शकलेलं नाही. मात्र त्यांनी आत्महत्या केली असावी अशा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.