अभिजीत बिचकुलेचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद ? जामीन न्यायालयाने फेटाळला
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा खंडणी प्रकरणातील जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद झाला आहे. अभिजीत बिचुकले मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना २१ जून रोजी अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती.
अभिजीत बिचुकले यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी जामीन झाल्यावर पोलिसांनी खंडणी प्रकरणात त्यांना अटक केली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आज झालेल्या सुनावणीत सात वर्षांपूर्वी आरोपीवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. वेळोवेळी त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदवल्या. बिचुकले यांचे तोंड आवरावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली.
बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढविली. या काळात आरोपीस पोलीस संरक्षण होते. तरीही त्यास या प्रकरणाचे वॉरंट बजवाले नाही अथवा ताब्यातही घेतले नाही. आरोपी आजही सातारा शहरात फिरत असतो. त्यामुळे तो फरारी होता हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे ठरत आहे. तरी आरोपीस जामीन द्यावा, असा युक्तिवाद ऍड.शिवराज धनवडे यांनी केला.
दरम्यान, सरकारी पक्षातर्फे ऍड मिलिंद ओक म्हणाले, ‘आरोपी हा कलाकार असून एका मालिकेत सध्या तो स्पर्धक आहे. त्याच्या करिअरचा विचार करून त्यास अटी शर्थीवर जामीन देण्यास हरकत नाही. तसेच त्याने संबधित मालिकेत स्पर्धक म्हणून खेळताना न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन व चालू असलेल्या प्रकरणांवर कोणतेही भाष्य करू नये, हे निर्बध ठेवावेत’.
कोण आहेत अभिजीत बिचुकले?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.