अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल: गुलाम नबी आझाद
नवी दिल्ली: “जर पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्याने नेतृत्व केले, तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करु शकेल, अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिलेला आहे. काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाचे नेतृत्व आणि कामकाजाबद्दल असहमती दर्शवणारे पत्र लिहिलेले होते. या पत्रावर गुलाम नबी आझाद यांनीही सही केलेली होती. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला चार दिवस उलटल्यानंतर ते म्हणाले की नियुक्त केलेल्या कॉंग्रेस अध्यक्षांना पक्षात एक टक्काही पाठिंबा नाहीये.
गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही निवडणूक लढवता तेव्हा याचे फायदे होतात, कमीत कमी 51 टक्के नेते तुमच्या पाठीशी आहेत, हे तुम्हाला माहित असतं. तर दुसरे, तिसरे किंवा चौथे स्थान मिळवणारे असा विचार करतील की कष्ट करून आपल्याला पक्षाला बळकट करावे लागेल आणि पुढच्या वेळी आपण जिंकू” शकतोय. “सध्या ज्या अध्यक्षांना निवडले गेले आहे, त्यांना एक टक्काही पाठिंबा नसावा. जर कॉंग्रेस कार्यकारी समितीची निवड झाली, तर त्यांना काढता येणार नाही. मग अडचण कुठे आहे?” असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. आमच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष यांना आपले पद गमावण्याची भीती आहे, असेही आझाद म्हणालेले आहेत.