आसाममधील ताबा केंद्रातील मृतांची संख्या २९ वर
नवी दिल्ली | महाईन्यूज
आसामातील घुसखोरांना डांबण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताबा केंद्रात (डिटेन्शन सेंटर) आणखी एका व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याबरोबर ताबा केंद्रातील मृतांची संख्या आता २९ झाली आहे. ताबा केंद्रातील हा व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे त्याला १० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालेला आहे. याच रुग्णालयात आॅक्टोबरमध्येही एका ६५ वर्षीय घुसखोराचा मृत्यू झालेला होता.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताचे नाव दुलाल पॉल असे असून तो सोनीपूर जिल्ह्यातील अलिसिंगा गावचा रहिवासी होता. पॉल हा ११ ऑक्टोबर २०१७ पासून तेजपूरच्या ताबा केंद्रात होता. सूत्रांनी सांगितले की, आसामात सध्या सहा ताबा केंद्रे सुरू आहेत. तथापि, ही ताबा केंद्रे जिल्हा कारागृहातच तयार करण्यात आली आहेत. ताबा केंद्रांत सध्या १ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. सातवे ताबा केंद्र गोलपारा जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे. शासकीय माहितीनुसार, आसामच्या विदेशी नागरिक लवादाने ‘बेकायदेशीर विदेशी व्यक्ती’ घोषित केलेल्या लोकांना ताबा केंद्रात ठेवण्यात आले आहेत. मागील तीन वर्षांत ताबा केंद्रातील २८ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.