अतिवृष्टीतील आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना, नरेंद्र मोदी यांचे मराठीत ट्विट
मुंबई – अतिवृष्टीचा अत्यंत भीषण परिणाम महाराष्ट्राच्या विविध भागात झाला आहे. या पावसाचे आतापर्यंत ४८ बळी झाले असून शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या परिस्थितीत महाराष्ट्राच्या पाठिशी केंद्र सरकार उभं आहे, अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यासंदर्भात मोदींनी मराठीत ट्विट करून माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना टॅग करून मराठीत ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले’, असे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना बसलेला परतीच्या पावसाच्या तडाखा अत्यंत गंभीर आहे. या पावसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण बेपत्ता आहेत. या भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हातातोंडाशी आलेली पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच केली आहे. दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रावर कोसळलेलं पूरसंकट पाहता केंद्राने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. या घडामोडी सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला फोन महत्त्वाचा ठरला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक येथील विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना देतानाच अन्य आवश्यक सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.