अंडी आणि चिकनला ‘अच्छे दिन’; ग्राहकांना मोजावे लागणार ज्यादा पैसे
अंडी आणि चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या पसरलेल्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय कोलमडला होता. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते , तर अनेकांना मागणीअभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या. मात्र आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी, चिकन खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून मिळत असल्याने कुक्कूटपालन व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. अंड्याचे दर प्रति नग सात रुपयांपर्यंत तर चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांपर्यंत गेल्याने या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान २५ मार्चपासून देशभर सुरू झालेल्या लॉकडाउनचा जबरदस्त फटका कुक्कूटपालन व्यवसायाला बसला. वाहतूक बंदी आणि जिल्हा बंदीमुळे कोंबड्यांना खाद्य पोहोचू शकले नाही. अंडी आणि कोंबड्यांची वाहतूक थांबली. हॉटेल्स, मॉल, बाजार बंद झले, तर यात्रा, जत्रा रद्द झाल्याने अंडी आणि कोंबड्यांची मागणी ठप्प झाली. लॉकडाउनपूर्वी राज्यात रोज सुमारे अडीच कोटी अंड्यांचा पुरवठा सुरू होता, तर सुमारे दीड कोटी कोंबड्यांची विक्री केली जात होती. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि मागणी नसल्याने अनेक व्यावसायिकांनी २०-३० रुपयांना कोंबड्यांची विक्री केली. अंड्यांचे दरही दोन ते तीन रुपयांपर्यंत खाली आले होते. व्यवसायाचे आर्थिक गणित विस्कटल्याने अनेकांवर अंडी, कोंबड्या खड्ड्यात पुरण्याची वेळ आली. ५० टक्के व्यावसायिकांनी कुक्कूटपालन थांबवले. पोल्ट्रीधारकांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे गाऱ्हाणे मांडून मदतीची मागणी केली. मात्र, त्यांना आश्वासनांशिवाय काहीच हाती लागले नाही. सहा-सात महिन्यांच्या संकटानंतर हा व्यवसाय आता पुन्हा उभारी घेत आहे.
ज्या संकटामुळे कुक्कूटपालन व्यवसाय कोलमडला त्याच करोना संसर्गामुळे या व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि मागणीत वाढ असल्याने अंडी, चिकनचे दर वाढले आहेत. सध्या पोल्ट्री धारकांकडून पाच ते सव्वापाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे, तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले नुकसान भरून निघण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. उत्पादनात घट असल्याने ग्राहकांना मात्र यासाठी आणखी काही काळ ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.