भाजप सरकारमुळे कामगारामध्ये असुरक्षितेची भावना – कैलास कदम

पिंपरी – भाजप सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे कामगार कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक असुरक्षिततेच्या छायेत जगत आहे. त्यामुळे कामगारांच्या हक्क व जनजागृतीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 28 ) कामगार मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती कैलास कदम यांनी दिली.
कैलास कदम म्हणाले, ” केंद्र व राज्य सरकार कामगार हिताकडे दुर्लक्ष करुन कामगार कायद्यात अनेक अन्यायकारक बदल करीत आहे. मागील चार वर्षात कायद्यामध्ये अनेक अन्यायकारक बदल करून सर्वसामान्य जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. कामगारांच्या हक्कांसाठी, कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी चिंचवडमधील अॅटो क्लस्टरच्या सभागृहात कामगार मेळावा आयोजित केला आहे”
पत्रकार परिषदेला अजित अभ्यंकर (सिटू), आयटकचे माधव रोहम, इंटकचे उपाध्यक्ष अॅड. म. वि. अकोलकर, पुणे जिल्हा घरकाम संघटनेचे किरण मोघे, हिंदु मजदुर सभेचे अॅड. राम शरमाळे, राज्य कर्मचारी संघाचे नारायण जोशी, सिटूचे वसंत पवार, पुणे जिल्हा डिफेन्स कोऑर्डिनेशन कमिटी इंटकचे शशिकांत धुमाळ, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अनुराधा आठवले, पोस्ट इंटकचे पी.एस. शिंदे , आयटकचे व्ही. व्ही. कदम, वीज कामगार कॉंग्रेसचे प्रशांत माळवदे, कात्रज दुध डेअरीचे सुनील देसाई, मनोरुग्णालय येरवडयाचे सोपान भोसले, पोस्ट एम्प्लाईज युनियनचे रघुनाथ ससाणे, पीएमपी कामगार संघ इंटकचे राजेंद्र खराडे आदी उपस्थित होते.