गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : ‘गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार करणाऱ्या कथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करा. कोणालाही कायदा हातात घेऊ देऊ नका,’ असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना दिले आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मोदी यांनी कथित गोरक्षकांवर कारवाईची ग्वाही सर्वपक्षीय नेत्यांना दिली. ‘कायदा-सुव्यवस्था राखणं ही राज्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. या अनुषंगानं सर्व राज्य सरकारांना सूचना देण्यात आल्या आहेत. कथित गोरक्षकांच्या हुल्लडबाजीचं राजकारण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, त्यातून काहीही साध्य होणार नाही. सर्वच पक्षांनी हे थांबवायला हवं,’ असंही मोदी म्हणाले.
‘गोमातेचं रक्षण व्हावं ही देशातील प्रत्येकाची भावना आहे. मात्र, त्यासाठी कायदा आहे. कायद्याला धरूनच ते व्हायला हवं. त्यासाठी कुणीही कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतलं जाणार नाही. राज्य सरकारांनी याबाबत दक्षता बाळगावी,’ असं मोदी म्हणाले. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीतील चर्चेची ही माहिती दिली.