1 जून ते 31 जुलै दरम्यान 111 जिल्ह्यात कृषी कल्याण अभियान
नवी दिल्ली – 2022 सालापर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय बाळगत 1 जून ते 31 जुलै 2018 या अवधीत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे कृषी कल्याण अभियान राबवले जात आहे. शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे आणि शेतीची तंत्रे विकसित करता यावी यासाठी या अभियानाअंतर्गत सर्व प्रकारचे सहाय्य आणि सल्ला दिला जाणार आहे. नीती आयोगाच्या निर्देशानुसार विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या 111 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 25 गावांमध्ये ग्राम विकास मंत्रालयाच्या सल्ला मसलतीने हे अभियान राबवले जात आहे.
कृषी, सहकार आणि कृषक कल्याण विभाग, दुग्ध व्यवसाय, मत्स्योद्योग, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अशा विविध विभागांतर्फे या अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अभियानाच्या वाटचालीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभियानाच्या अवधीत या संबंधित गावांमध्ये सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डाचे वितरण करणे, सूक्ष्म सिंचनाची प्रात्यक्षिके आयोजित करणे, पायाच्या तसेच मौखिक आजारासाठी संपूर्ण लसीकरण करणे असे विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मधुमक्षिका पालन, मशरुमची लागवड आणि स्वयंपाक घरातील बाग अशा उपक्रमांबाबत प्रत्येक गावात माहिती आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात महिला आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.