वाराणसी “नेचर, कल्चर आणि ऍडव्हेंचर’चे केंद्र
वाराणसी – मल्टी मोडल टर्मिनलच्या प्रांरभामुळे वाराणसीला नवीन ओळख निर्माण होणार आहे. या टर्मिनलमुळे गंगेचा हा पारंपरिक रस्ता आधुनिक सुविधांसह “नेचर, कल्चर आणि ऍडव्हेंचर’चे केंद्र होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते वाजिदपूर गावातील सभेत बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी देशातल्या पहिल्या मल्टी मोडल टर्मिनलला राष्ट्राला समर्पित केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, बाबतपूर विमानतळाशी शहराला जोडणारी योजना, गंगेला प्रदूषण मुक्त करणारी योजना यासह सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या योजनेचे आज लोकार्पण झाले. या सर्व प्रकल्पांमुळे वाराणसीचा विकास होणार आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपण नद्यांचे मार्ग इतक्या व्यापक स्तरावर विस्तारण्यात यशस्वी झालो आहोत. पहिल्यांदा जेव्हा मी वाराणसी ते हल्दिया मालवाहतुकीच्या मार्गाची संकल्पना बोलून दाखवली होती. तेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली. पण आज या प्रकल्पाच्या उद्घाटनाने विरोधकांची तोंड बंद झाले आहे, असे ते आपल्या भाषणात म्हणाले.
वाराणसीत जितके सामान एका मालवाहतूक जहाजाने आणण्यात आले, तेवढंच सामान रस्तामार्गे आणण्यासाठी 16 ट्रक लागले असते. या जलवाहतुकीमुळे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होणार आहे. आज देशात 100 हून अधिक नॅशनल वॉटर हायवेवर काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाराणसीतील हे मल्टी मोडल टर्मिनल 206 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. त्याची लांबी 200 मीटर असून 45 मीटर रुंद आहे. या जेटीवर अवजड मालवाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी जर्मनीतील अत्याधुनिक क्रेन ठेवण्यात आली आहे. हल्दिया जलमार्ग सुरू झाल्याने दक्षिण आशियातील उद्योग क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होणार आहे.