रोहित शर्माची खेळी निर्णायक – हार्दिक पांड्या
- भारतासमोरील आव्हानात्मक लक्ष्यही झाले सोपे
ब्रिस्टॉल: रोहितची खेळी तिसऱ्या टी-20 सामन्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि विशेष अशी खेळी होती, असे प्रशंसोद्गार भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने काढले आहेत. रोहितच्या नाबाद शतकामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
तिसऱ्या सामन्यातील रोहित शर्माच्या नाबाद 100 धावांच्या खेळीचे कौतुक करताना हार्दिक पांड्या म्हणाला की, जेव्हा तुम्ही 200 धावांचा पाठलाग करत असता तेव्हा तुमच्या सलामीवीरांपैकी एकाने खेळपट्टीवर टिकून फटकेबाजी करणे आवश्यक असते आणि अगदी अशा प्रकारचीच खेळी कालच्या सामन्यात रोहितने केली. त्यामुळे आव्हानात्मक लक्ष्य असतानाही आम्हाला विजय मिळवता आला.
इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या टी-20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 198 धावांची मजल मारताना भारतासमोर विजयासाठी 199 धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. मात्र भारताने रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीने हे आव्हान 18.4 षटकांतच परतवून लावताना सामन्यासह मालिका आपल्या नावे केली. पहिल्या दोन्ही सामन्यांत सपशेल अपयशी ठरलेल्या रोहितने सलामीला जाऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना भारताला विजयी केले.
यावेळी सर्वांकडून रोहितच्या खेळीचे कौतुक होत असताना मुंबई इंडियन्स संघातील त्याचा सहकारी हार्दिक म्हणाला की, जेव्हा तुम्ही मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी होता, तेव्हा अशा निर्णायक सामन्यात तुमच्यावर दडपण असते. या दडपणातून बाहेर येत चांगली खेळी करणे, हे तुमच्यासमोरील मोठे आव्हान असते. या आव्हानाचा यशस्वी सामना करताना रोहितने भारताला रोमांचकारी विजय मिळवून दिला. रोहितची ही खेळी खरोखरीच बहुमोल आणि तितकीच विशेष होती.