मुंबईतील भाजप कार्यालयासमोर झेंडे लावून कार्यकर्ते गायब
मुंबई – पाच राज्यांच्या निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपला सत्ता टिकवणं अवघड झाल्याचं चित्र आहे. त्याचा परिणाम देशभरातील भाजप कार्यालयात दिसत आहे. एरव्ही कोणत्याही राज्याचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करणारं मुंबई भाजप कार्यालय आज शांत आहे. मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट आहे. ऑफिसबाहेर झेंडे आणि टेबल लावले आहेत, पण तिथे कोणीच नाही. कार्यालयात एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी उपस्थित नाही. वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यात आत्मविश्वास नाही. हे चित्र सध्या मुंबई भाजप कार्यालयात पाहायला मिळत आहे.
यापूर्वी ज्या ज्या राज्यात भाजपचं सरकार आलं, त्या त्या वेळी मुंबई भाजप कार्यालयात फटाके फोडून, गुलाल उधळून सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. मात्र आता विजय न मिळाल्याने भाजप कार्यालय ओस पडलं आहे.