पाणी प्रश्न पोलिस सोडविणार आहेत का? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात जनतेला दररोज पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी भाजप व अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले, परंतू, राजकीय हस्तक्षेपाने आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. शहराच्या पाण्यासाठी आंदोलन करायचे नाही तर मग काय करायचे, जनतेच्या समस्या पोलिस सोडविणार आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी पुरवठा विभागात आंदोलन केले. त्या आंदोलनामुळे पोलिसांनी विनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे कारण देत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर साने म्हणाले की, महापालिकेत सत्ताधारी भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-यावर जाणिवपुर्वक गुन्हे दाखल होत आहेत. हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसावर दवाब आणून राजकीय हस्तक्षेप झाला आहे. तसेच पोलिसही सत्ताधा-यावर अदखल पात्र आणि विरोधकांवर दखल पात्र गुन्हे नोंदवून पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.