पिंपरी चिंचवडसाठी देहूच्या बंधा-यातून उचलणार पाणी – आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराला तत्काळ पाणी मिळावे, याकरिता भामा-आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. याकरिता इंद्रायणी नदीच्या देहू बंधा-यातून पाणी उचलण्याची परवानगी द्यावी, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
नागपुर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यासमेवत शहराच्या पाणी पुरवठा योजनांबाबत झालेल्या बैठकीची माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी, तर आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्या पाण्याचे आरक्षण राखीव ठेवावे, याकरिता महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
तसेच आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पांचा डीपीआर तयार असून निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे आरक्षणाला मंजूरी मिळाल्यास तत्काळ कामास सुरुवात करण्यात येणार आहे. आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनीच्या नियोजित कामाला विलंब लागणार आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीवरील देहू बंधा-यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची तत्काळ परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सरकारने परवानगी दिल्यास देहू येथील बंधा-यातून चिखलीत पाणी आणून तेथून परिसरातील भागास पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.