देशातल्या सात प्रमुख शहरांतील घरांच्या मागणीत 25 टक्के वाढ
नवी दिल्ली – देशातल्या सात प्रमुख शहरांतील घरांच्या मागणीत गेल्या एप्रिल महिन्यात मार्च महिन्याच्या तुलनेत 25 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे अशी माहिती ऍनारॉक नावाच्या एका संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. त्यात दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरातील मागणीत झालेल्या मोठ्या वाढीचा वाटा मोठा आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नाई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या सात शहरांमध्ये मार्च महिन्यात 1382 घरे विकली गेली होती तर एप्रिल महिन्यात एकूण 1726 घरे विकली गेली आहेत. पुणे आणि कोलकाता ही दोन शहरे वगळता अन्य पाच शहरांतील घरांच्या मागणीत चांगली वाढ झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
बाजारात ग्राहकांकडून मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद आणि रिअल इस्टेटच्या वाढीसाठी अनुकुल अशा धोरणांमुळे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात सन 2018 या वर्षात चांगली सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांतील उलाढाल चांगली झाल्याने त्यातून हे संकेत मिळत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. त्यातच एप्रिल महिन्यात घरांच्या विक्रीत नोंदवली गेलेली 25 टक्के वाढ समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.
एप्रिल महिन्यात जितकी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली त्यात परवडणाऱ्या स्वरूपातील घरांचे प्रमाण 43 टक्के (चाळीस लाखांच्या आतील घरे), मध्यम स्वरूपातील घरांचे प्रमाण 33 टक्के (40 ते 80 लाखांची घरे) इतके वाढले आहे. 80 लाख ते दीड कोटी रूपयांच्या किंमतीतील घरांच्या उपलब्धतेचे प्रमाण या महिन्यात 11 टक्क्यांनी वाढले असून दीड कोटी पेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांचे प्रमाण 13 टक्क्यांनी वाढले आहे.