चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली – देवेंद्र फडणवीस
पिंपरी (महा ई न्यूज) – क्रांतिवीर चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतावले. संकुचित विचारांपेक्षा देशाचा विचार केला. त्यांनी स्वातंत्र्याची बिजे रोवली. क्रांतीची लढाई उभारली. त्यांच्या बलिदानाचे मोल जपायला हवे. देशासाठी बलिदान करणा-या चापेकर बंधूंचे विस्मरण होता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या वतीने चिंचवडमध्ये सहा मजली स्मारक उभारण्यात येत आहे. त्याच्या दुस-या टप्याचे आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मोरया गोसावी मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे, चापेकर कुंटुंबातील अनुया चापेकर, राजू चापेकर, प्रतिभा चापेकर, चेतन चापेकर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित आहेत.
चापेकर बंधूंनी क्रांतीचे स्फुल्लिंग निर्माण केले. देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर क्रांती तरुणामध्ये, जनमानसापर्यंत पोहचली. अनेक क्रातिकारकांना चापेकर बंधूंनी प्रेरणा दिली. त्या क्रातीकारकांची आठवण स्मारकाच्या माध्यमातून होणार आहे. इतिहास विसरणा-या समाजाला वर्तमान असतो; मात्र भविष्य नसते. इतिहास जागृत ठेऊन प्रेरणा घ्यायची असते. आपल्याला आता स्वातंत्र्याची लढाई लढता येणार नाही. स्वराज्य मिळाले आहे. सुराज्याची लढाई सुरु करुन सर्वांपर्यंत विकासाची गंगा पोहचवायची आहे, असेही फडणवीस म्हणाले.