कर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत
कर्नाटकातील चामराजनगरमधल्या सुलवाडी या गावातल्या मंदिरात प्रसाद खाल्ल्याने 11 जणांचा मृत्यू झाला तर 80 जणांना पोटदुखी, मळमळ आणि इतर त्रास सुरु झाला. मृतांमध्ये आता 15 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणाची दखल सरकारने घेतली असून मंत्री पुट्टरंगा शेट्टी यांनी ज्या रूग्णालयात रूग्णांना विषबाधेप्रकरणी दाखल करण्यात आले आहे तिथे भेट दिली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे अशीही माहिती समजते आहे. प्रसाद विषबाधा प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असेही शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
प्रसाद वाटण्याआधी दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच बहुदा कोणीतरी प्रसादात विष कालवले. या घटनेमुळे 11 निष्पापांचा बळी गेला अशीही माहिती समोर येते आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर ज्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांचा खर्चही सरकारतर्फे केला जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे.