आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धेनंतरही देता येणार बोर्ड परीक्षा
- येत्या वर्षी 6 जणांना लाभ : शारीरिक शिक्षणाला वाव देण्यासाठी सीबीएसईचा निर्णय
पुणे : नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण अनिवार्य’ हा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला. त्यालाच जोडून आता सीबीएसईने आणखी एक निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा स्पर्धेनंतर देण्याची मुभा या निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.
खेळाडू विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सीबीएसईने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांतर्गत यंदाच्या वर्षी परीक्षेच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीदरम्यान अनेक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्त्व करत असतात. मात्र इयत्ता दहावी व बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कारणामुळे अनेकदा हे प्रतिनिधित्व करणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळेच क्रीडा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विशेष परवानगी घेत बोर्डाने या खेळाडूंची परीक्षा उशिराने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षात 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीमधील दोन तर दहावीमधील चार विद्यार्थी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये दिल्ली, लखनौ, पटियाला, विजयवाडा, अजमेर येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामुळे आता देशातील खेळाडू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्त्व करताना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी सीबीएसईच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्या पार्श्वभूमीवर हा देखील निर्णय तितकाच महत्त्वाचा ठरणारा आहे.