काश्मीरातील नागरीकांना दिल्लीत धक्काबुक्की
नवी दिल्ली – काश्मीरातील एका गटाला दिल्लीच्या सनलाईट कॉलनी भागात धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. काल रात्री 30 ते 40 जणांच्या जमावाने काश्मीरी लोकांच्या एका गटाला चौफेर घेरून त्यांना धक्काबुक्की केली. त्यात चार महिलांचाही समावेश होता. आपण काश्मीरी असल्यामुळेच आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
आमच्यापैकी अनेकांना हॉकीस्टीकच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली त्यात एकाचा हात मोडला आहे, हा नियोजित हल्ला आहे अशी तक्रार त्यांच्यापैकी एकाने केली आहे. काश्मीरी दहशतवद्यांना परत पाठवा अशा घोषणाही हल्लेखोरांनी दिल्या असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्यावर या आधीही दोनदा असे हल्ल्याचे प्रकार घडले होते असे त्यांच्यापैकी एकाने सांगितले.